हिवरखेड प्रतिनिधी:-बाळासाहेब नेरकर
तब्बल पन्नास वर्षानंतर जि प म गांधी विद्यालयातील १९७४ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांची अनोखी शाळा पुन्हा भरली आणि ९१ वर्षीय विज्ञानाच्या गुरुजींनी त्यांना आनंदी जीवनाचे लाखमोलाचे गुरुमंत्र दिले. आपल्या मित्रांना पन्नास वर्षानंतर पाहून अनेकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले.
शाळेचे दिवस संपले की प्रत्येकजण आपल्या करियरसाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतो. मात्र ज्या शाळेत आपण शिकलो, घडलो, वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांबरोबर आपण मैत्रीचे नाते जोडले, ती नाळ मात्र तशीच असते. पुन्हा एकदा भेटावे, सर्वांसोबत हितगुज करावे असे सर्वांनाच वाटते. पण प्रत्येकजणच आपआपल्या नोकरी-धंद्यात, संसारात व्यस्त असल्यामुळे ते सहजासहजी शक्य होत नाही. मात्र अशक्यही नसते.ज्या शाळेत आपण घडलो, आयुष्य जगण्याचे तंत्र-मंत्र मिळाले, त्या शाळेतील त्याच विद्यार्थी मित्रांसोबत पुन्हा ५० वर्षानंतर भेटण्याची संधी चालून आली स्नेह मिलन सोहळ्यामुळे. सन १९६४ ते १९७४ च्या तुकडीतील काही विद्यार्थी “लंगोटीयार”या नावाने व्हाट्सॲप ग्रुप मधे एकमेकांशी संपर्कात होते. अशातच सर्वांनी सहचारीणीसह एकत्र येऊन कुठेतरी भेटून शाळेतील आठवणींना उजाळा द्यावा अशी इच्छा व्यक्त केली. त्याला सर्व मित्रांनी सकारात्मक प्रतिसाद देत हिवरखेड येथील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या सदाशीव संस्थानमधे भेटण्याची योजना आखून दोन दिवसीय स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात केला. अखेर १८ सप्टेंबरचा तो दिवस उजळला. राठी हॅालमधे सर्व मित्र एकत्र गोळा झाल्यानंतर सर्वप्रथम सरस्वतीपुजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. प्रत्येकाने आपली व पत्नींची ओळख करून दिली. नव्या-जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांच्या परिवाराविषयी, कामकाजाविषयी व सध्या सुरु असलेल्या आपल्या आयुष्याची माहीती दिली. गप्पा, चुटकुले, संगीत रजनी, गझल गायन करत असतांना गप्पा रंगत गेल्या. सिल्वर कॅाइन गेम खेळून चांदीच्या बक्षीसांची लयलूट करण्यात आली. एवढेच नव्हे तर या ५० वर्षाच्या कालखंडात ज्या शिक्षकांचे आणि वर्गातील मित्रांचे दुःखद निधन झाले त्या सर्वांना दोन मिनिटांचे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जुन्या मित्रांच्या आणि शिक्षकांच्या आठवणींनी अनेकांचे डोळे पाणावले होते.
दुसरे दिवशी दि. १९ सप्टेंबरला ऋृषीतुल्य आदर्श विज्ञान शिक्षक श्री दे ना महाजन गुरुजींचा सत्कार व कृतज्ञता सोहळा वर्गमित्र , त्यांच्या सहचारीणी, शहरातील प्रतिष्ठीत व्यक्ती यांचे उपस्थितीत पार पडला व ७४ च्या बॅचच्या आठवणींना उजाळा मिळावा ह्या उद्देशाने सदाशीव परीसरात ७४ वृक्ष लागवड करण्यात आली. प्रत्येकाने ठरावीक वृक्षसंवर्धनाची जबाबदारी घेउन ड्रीप इरीगेशन द्वारे पाणी देण्याच्या व्यवस्थेचे स्थायी नियोजन करुन दिले.
तसेच सातपुडा कला व वाणिज्य महाविद्यालय, भोपळे विद्यालय, कब्रिस्तान येथेही प्रत्येकी ५० वृक्ष लागवड करण्यात आली.
या कार्यक्रमातील प्रत्येक क्षणाच्या गोड आठवणी जपत पुढच्या वर्षी पुन्हा स्नेह मिलन आयोजन करावे हे ठरले.
कार्यक्रमाचा शेवट स्नेह भोजनाचा आस्वाद घेत झाला.
