निसर्गप्रेमी सरपंच आप्पा कदम यांची संकल्पपूर्ती
मियावाकी प्रकल्प अंतर्गत आतापर्यंत तब्बल १ लाख झाडे जगवली
मोताळा:- सागर वानखेडे
मोताळा तालुक्यातील ग्राम सिंदखेड गावाने राज्यस्तरीय वाटर कप स्पर्धेत नाविन्यपूर्ण कामगिरी करून राज्यभरात ख्याती मिळवली. राज्यस्तरीय माझी वसुंधरा स्पर्धेत द्वितीय क्रमांक तर जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम स्पर्धेतही गावाने उत्तम कामगिरी केली आहे आज २८ डिसेंबर रोजी गावकऱ्यांच्या सहकार्यातून निसर्गप्रेमी सरपंच आप्पा कदम यांच्या संकल्पनेतून २१ हजार विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थी, गावकरी, महिला, व ग्राम प्रशासन यांच्या समन्वयातून आतापर्यंत मीया वाकी प्रकल्पांतर्गत तब्बल १ लाख वृक्षारोपणाची स्वप्नपूर्ती पूर्ण झाली असल्याने सिंदखेड गावचे निसर्गप्रेमी सरपंच आप्पा कदम यांनी गावकऱ्यांचे आभार व्यक्त केले आहे.मोताळा तालुक्यातील पाणीदार गाव म्हणून सिंदखेड गावाची ओळख संपूर्ण जिल्हा नव्हे तर राज्यभरात निर्माण झाली आहे. ओसाड पडलेले जमीन क्षेत्रात विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करून मृदा व जलसंधारण कार्यात ग्रामप्रशासन मोलाची कामगिरी करीत आहे. औषधीजन्य वनस्पती, विविध प्रकारचे गवते, पशुखाद्य वनस्पती, शेतीपूरक वनस्पती, बांबू, विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करून गावात हरियाली व चैतन्याचे वातावरण यामुळे निर्माण झाले आहे. गावाच्या जमीन क्षेत्रात पाण्याची पातळी वाढली आहे त्यामुळे जलसिंचन स्त्रोत वाढले, पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली असून फळबाग, बागायती शेती, पशुपालन, शेतीपूरक व्यवसाय यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक सुधारणा होत आहे. त्यामुळे आदर्श सिदखेड समृद्ध गाव म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करीत आहे. प्रशासन व गावकरी यांच्या समन्वयातून निसर्गप्रेमी सरपंच आप्पा कदम यांची संकल्पना जिल्हावासीयांना एक आदर्श निर्माण केला आहे.
