नवी दिल्लीत लोकसभा आणि राज्यसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात अकोला-पूर्णा-नांदेड रेल्वे मार्गाचे प्रश्न सर्व खासदारांनी मांडले नसल्याने रेल्वे संघटना, रेल्वे प्रवासी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड लोकसभा मतदारसंघ अकोला-पूर्णा-नांदेड रेल्वे मार्गावर येतात. त्यात अकोल्याचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे नांदेडचे रवींद्र चव्हाण, परभणीचे संजय जाधव, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, वाशिमचे संजय देशमुख, यांच्यासह अशोक चव्हाण आणि गोपछडे फौजिया खान हे तीन राज्यसभा खासदार आहेत. अकोला-पूर्णा-नांदेड रेल्वे मार्ग हा दक्षिण भारताला उत्तर भारताशी जोडणारा सर्वात जवळचा मार्ग आहे, परंतु तो पूर्णपणे दुर्लक्षित आहे. या मार्गावर फक्त काही नियमित गाड्या धावतात, बाकीच्या साप्ताहिक गाड्या आहेत. संसदेचे अधिवेशन सुरू होऊन पंधरवडा उलटून गेला असून अधिवेशन आणखी २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. मात्र या अधिवेशनात मराठवाडा- विदर्भाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अकोला-पूर्णा-नांदेड रेल्वे मार्गावरील एकाही खासदाराने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली नाही किंवा संसदेत प्रश्नोत्तराच्या तासात कोणताही प्रश्न विचारला नाही.
संबंधित सर्व खासदारांच्या निष्क्रियतेमुळे नाराजीचा सूर उमटत आहे.
अकोला-पूर्णा-नांदेड रेल्वे मार्गाबाबत खासदारांनी दाखविलेल्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. दीड वर्षांपूर्वी 29 ऑगस्ट 2023 रोजी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने अकोला-पूर्णा-नांदेड रेल्वे मार्गावर हिंगोली-अकोला मार्गे नांदेड- कुर्ला या मार्गावर साप्ताहिक गाड्या सुरू करण्याचे आदेश दिले होते. दीड वर्ष उलटले तरी दक्षिण मध्य रेल्वे ने ही गाडी सुरू केली नाही, तर आजपर्यंत अकोला-पूर्णा-नांदेड रेल्वे मार्गावर मुंबईला जाण्यासाठी रात्रीची एकही गाडी नाही. नुकतीच नांदेड-पाटणा व्हाया अकोला-हिंगोली ही गाडी सुरू झाली. या ट्रेनद्वारे मराठवाडा-विदर्भाचा उत्तर भारतातील प्रयागराज, अयोध्या, वाराणसी, बुद्धगया, पाटणा, चित्रकूट या धार्मिक स्थळांशी थेट संपर्क होता. मात्र ही गाडीही बंद पडल्याने लाखो हिंदू, शीख, बौद्ध आणि जैन भाविकांमधून संताप व्यक्त होत आहे. पूर्णा रेल्वे बायपासचे काम संथ गतीने सुरू आहे, विद्युतीकरण होऊन दोन वर्षे उलटली तरी गाड्या अजूनही डिझेल इंजिनवर धावत आहेत. वाशिम बडनेरा नूतन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण होऊन दोन वर्षे उलटली तरी अद्याप निधी देण्यात आलेला नाही. अकोला रेल्वे स्थानकावर आतापर्यंत मध्य रेल्वे आणि एससीआर रेल्वे ट्रॅक जोडण्यात आले आहेत काय ?. नांदेड-अयोध्या मार्गे अकोला आणि नांदेड मार्गे अकोला ते हरिव्दार, चारधाम, हेमकुंड साहिब गुरुद्वारा ट्रेन आणि नागपूर गोवा मार्गे अकोला- परभणी ट्रेनची मागणी पूर्ण झाली नाही. अकोला-पूर्णा-नांदेड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्याची मागणी होत आहे. अमृत भारत योजनेंतर्गत रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. अनेक समस्या आहेत ज्या रेल्वे मंत्रालयाने सोडविणे गरजेचे आहे, मात्र अकोला-पूर्णा-नांदेड रेल्वे मार्गावर सर्व खासदारांच्या निष्क्रियतेमुळे सर्वच कामांना विलंब होत आहे असा आरोप SCR दक्षिण मध्य रेल्वे चे ZRUCC सदस्य राकेश भट्ट यांनी केला आहे.
अकोट मुंबई मेळघाट एक्सप्रेस तत्काळ सुरु व्हावी
सद्यस्थितीत अकोट हे रेल्वे स्टेशन अकोट तेल्हारा संग्रामपूर जळगाव जामोद अंजनगाव परतवाडा अचलपूर चिखलदरा धारणी मेळघाट इत्यादी तालुकास्तरीय क्षेत्रांसाठी सोयीस्कर असून लक्षावधी जनता जुळलेली आहे. अकोट येथून फक्त एक लोकल डेमू सेवा अकोल्यासाठी सुरू असून अकोट अकोला वाशीम हिंगोली पूर्णा मार्गे मुंबईसाठी दररोज धावणारी मेळघाट एक्सप्रेस तात्काळ सुरू करावी अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते धिरज संतोष बजाज यांनी केली आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी अकोट मुंबई मेळघाट एक्सप्रेस साठी संसदेत आवाज बुलंद करावा असे आवाहन हिवरखेड विकास मंचच्या वतीने करण्यात येत आहे.
