तेल्हारा प्रतिनिधी:_
तेल्हारा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना नम्र आवाहन आहे की येत्या 15 सप्टेंबर पर्यंत आपल्या शेतातील पिकाची ई पीक पाहणी करून घ्यावी जेणे करून आपल्याला मिळणाऱ्या कोणत्याही लाभापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही असे आवाहन तेल्हारा तहसीलदार समाधान सोनवणे यांनी केले आहे.
ई पिक पाहणीचे शेतकऱ्यां साठी पुढील फायदे आहेत. शेतकऱ्यांना देय असणाऱ्या कोणत्याही योजनेचा थेट लाभासाठी ई पीक पाहणी प्रकल्पातील माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे , राज्यभरामध्ये एकाच प्रकारच्या पिकासाठी एकच संकेतांक क्र. निश्चित करण्यात येत असल्याने गाव, तालुका, जिल्हा, विभाग निहाय कोणत्याही पिका खाली किती क्षेत्र आहे याची निश्चित आकडेवारी सहज उपलब्ध होणार आहे. कृषी विभागाच्या विशिष्ट पिकासाठी देय असणाऱ्या योजना जसे ठिबक, तुषार सिंचन योजना इत्यादी लाभ खातेधारकांना अचूक रित्या देणे सहज शक्य होणार आहे. आधारभूत किमतीवर कापूस, हरभरा व तूर खरेदी इत्यादी योजनांसाठी देखील पीक निहाय लागवडीचे क्षेत्र व उत्पन्नाचा अचूक अंदाज काढणे शक्य होणार आहे. नुकसान भरपाई अदा करणे शक्य होणार आहे.तरी सर्व शेतकरी बंधुनी ई पीक पाहणी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार समाधान सोनवणे यांनी केले आहे.
